एसबीआय बँक दरोडा प्रकरण : ग्राहक ठाम, बँक नमली नाही
रात्री उशिरापर्यंत बँकेला कुलूप ठोकून ग्राहकांचे आंदोलन
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील चडचण येथे गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी स्थानिक एसबीआय बँकेत झालेल्या दरोड्यात सोने गमावलेल्या ग्राहकांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत बँकेला कुलूप ठोकून आंदोलन केले.
सोने गमावलेल्या ग्राहकांनी बँकेत येऊन, “आम्हाला सोने किंवा त्याची रक्कम देण्यासाठी बँकेने दिलेल्या सर्व मुदती संपल्या आहेत. त्यामुळे आमचे सोने किंवा आम्ही गहाण ठेवलेल्या सोन्याची आजच्या बाजारभावानुसार रक्कम तात्काळ द्यावी,” अशी मागणी केली. त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून रात्री ११ वाजेपर्यंत बँकेच्या आत आंदोलन सुरू ठेवले.
१६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या दरोड्याला नऊ महिने उलटूनही आपले दागिने परत न मिळाल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत मोठे आंदोलन केले.
त्यादिवशी दरोडेखोरांनी कंट्री पिस्तूलमधून हवेत गोळीबार करून बँक कर्मचारी व ग्राहकांचे हातपाय बांधले होते आणि सुमारे १.५ कोटी रुपयांची रोकड तसेच २० किलो सोने लुटले होते. या घटनेनंतरही लॉकरमध्ये ठेवलेले किंवा कर्जासाठी गहाण ठेवलेले सोने परत न मिळाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांसोबत बैठक घेऊन ६ जूनपर्यंत सोने किंवा त्याची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या निव्वळ वजनानुसार आजच्या बाजारभावासह २० टक्के अतिरिक्त रक्कम देण्याची तयारी बँकेने दर्शविली होती. मात्र ग्राहकांनी आजच्या बाजारभावानुसार मूळ वजनाइतकेच सोने परत द्यावे, अशी भूमिका घेतली होती. तरीही १० जून उलटून गेल्यानंतरही कोणतीही भरपाई न मिळाल्याने ग्राहकांचा संताप आणखी वाढला.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच चडचणचे पीएसआय सोमेश गेज्जी आणि सीपीआय परशुराम मनगूळी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून, “बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १५ जून रोजी तुमच्या सोन्याची योग्य रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे सोमवारपर्यंत संयम बाळगा आणि त्यानंतर तुमची रक्कम स्वीकारा,” असे सांगितले. त्यांच्या समजावणुकीनंतर ग्राहकांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी शेकडो ग्राहकांसह विभागीय व्यवस्थापक विकास भगोत्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद वाळी, शिवकुमार, वेंकटेश राजपूत आदी उपस्थित होते.
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बँकेसमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी स्थानिक एसबीआय बँक दरोडा प्रकरणात सोने गमावलेल्या ग्राहकांनी बुधवारी सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत बँकेला कुलूप ठोकून आंदोलन केले.
