अचानक लागलेल्या आगीत खत गोदाम जळून खाक ; मोठे नुकसान
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
चडचण तालुक्यातील धुळखेड (ता. चडचण) गावाजवळ, विजयपूर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिवानंद पाटील यांच्या मालकीच्या खत दुकानाला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे खत, कीटकनाशके व कृषी उत्पादने जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.
खत गोदामाला लागलेली आग लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढत गेल्याने इंडी अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक तपासात विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलताना दुकानाचे मालक शिवानंद पाटील यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गोदामात साठवलेले सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे खत व कीटकनाशक औषधे जळून नष्ट झाली आहेत.
या प्रकरणी झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
