बेंगळुरू चेंगराचेंगरीची घटना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; भाजपाच्या नेत्यांची मागणी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
बेंगळुरू येथील चेंगराचेंगरीची घटना पाहता काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपच्या जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शहरात आंदोलन केलं.
विजयपूर येथील गांधी चौकात एकत्र जमलेल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. "काँग्रेस सत्तेवरून खाली येईपर्यंत लढा थांबणार नाही" अशा आशयाच्या फलक घेऊन त्यांनी रोष व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना खासदार रमेश जिगजिणगी म्हणाले, *बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सव दरम्यान 11 निरपराध लोकांनी जीव गमावला असून, 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सरकार आणि गृहखात्याने योग्य ती सुरक्षा द्यायला हवी होती. पण अपयश झाकण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर खापर फोडण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, मृतांच्या जीवाची किंमत फक्त 10 लाख रुपये समजणं ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची नीच मानसिकता दर्शवते, असा आरोप त्यांनी केला.
या घटनेमुळे राज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा मलीन झाली आहे. पोलीस खात्याला दोषी ठरवून शिक्षा दिली जात आहे, हे म्हणजे “**गुब्बीवर ब्रह्मास्त्र**” टाकल्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री त्वरित राजीनामा दिला नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
माजी मंत्री अप्पासाहेब पटणशेट्टी यांनी बोलताना सांगितले की, आरसीबी विजयोत्सवासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. काही मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सेल्फीच्या हव्यासामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृह मंत्री यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेतील जबाबदार लोकांवरच कारवाई व्हायला हवी, पोलीस खात्यावर नव्हे. सरकार आपल्या चुकीची जबाबदारी घेण्यास तयार नाही. अशा सरकारने तातडीने राजीनामा देऊन नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी अप्पासाहेब पटणशेट्टी यांनी केली.
या आंदोलनात भाजप राज्य एससी मोर्चाचे सरचिटणीस उमेश कारजोळ, तसेच उमेश कोळकूर, सुरेश बिरादार, मल्लिकार्जुन जोगूर, विजय जोशी, महेंद्र नायक, व महानरपालिकेचे सदस्य राहुल जाधव, राजू मग्गीमठ, राजेश तवसे, रवीकांत बगली, पापूसिंग राजपूत, श्रीहर्षगौड पाटील, जगदीश मुच्छंडी, स्वप्ना कणमुचनाळ, भारती भुंईयार, भारत कुलकर्णी, संतोष निंबरगी इत्यादी अनेक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.