ऊसाच्या शेतातील आग विझवायला गेलेल्या शेतकऱ्याचा जिवंत जळून मृत्यू
विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवायला गेलेल्या एका शेतकऱ्याचा आगीत अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हार तालुक्यातील महादेवप्पा तेवर यांच्या शेताजवळ घडली आहे.
मृत व्यक्तीची ओळख संगप्पा ईरप्पा कुंभार (वय 80) अशी झाली आहे. त्यांनी स्वतःच्या शेतातील गव्हाच्या काड्या जाळण्यासाठी आग लावली होती. मात्र ती आग शेजारच्या ऊसाच्या शेतात पसरली. ती विझवण्यासाठी गेले असता संगप्पा अचानक आगीत सापडले आणि दुपारच्या सुमारास जिवंत जळून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी आसपास कोणीही नव्हते. संध्याकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.
माहिती मिळताच कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून या संदर्भात कोल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
