भीमा नदीचा रौद्र अवतार; महाराष्ट्र – कर्नाटक दळणवळण खंडित, हजारो एकर शेती पाण्याखाली
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आले असून, ती धोका पातळी ओलांडून वाहत आहे. महाराष्ट्रातील उजनी, सेना आणि वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
**धोका पातळी ओलांडली :** भीमा नदीवरील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण ९ बंधाऱ्यांवर पाण्याचा प्रवाह धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबळी गावाजवळील सेना नदीवरील पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावर पाणी शिरल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक दळणवळण पूर्णतः खंडित झाले आहे.
**२.५ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग :**
सेना, उजनी व वीर धरणांमधून एकत्रितपणे २.५ लाख क्यूसेकपेक्षा अधिक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे सेना नदीच्या महापुरामुळे महाराष्ट्रातील अनेक गावे संकटात सापडली आहेत.
**इंडी तालुक्यातील पूरस्थिती :** जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील हिंगणी बॅरेजपासून खालील गावांमध्ये पूराची शक्यता असून प्रशासन सतर्क आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून
भीमा नदीच्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील नदीकिनाऱ्यावरील हजारो एकर शेती – ऊस, तूर, कापूस, केळी इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक आमदार व अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आहे.
*रस्ते बंद, प्रवाशांचे हाल :** वडकबळी, हत्तूर येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून, बुधवारी सकाळपासून महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस केवळ राज्याच्या सीमांपर्यंतच धावत आहेत. त्यामुळे आंतरराज्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाण्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
