आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत अनावश्यक वाद निर्माण करू नये – एम. बी. पाटील
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचित केले आहे की, आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत अनावश्यक वाद निर्माण करू नये. शहरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा मुद्द्यांवर अनावश्यक चर्चा करून फडणवीस यांनी दोन्ही राज्यांमधील सौहार्द बिघडवू नये.
कर्नाटकच्या भूमी आणि भाषेच्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. आपली भूमी आणि पाणी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले
आलमट्टी धरणाच्या उंचीमुळे महाराष्ट्रातील कोल्हापूरसारख्या भागांत पूरस्थिती उद्भवते, असे फडणवीस यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. यावर प्रतिक्रिया देताना एम. बी. पाटील म्हणाले की, धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला कायदेतज्ज्ञांचा पाठिंबा आहे, आणि महाराष्ट्राने अनावश्यकपणे हा वाद उकरून काढला आहे. कर्नाटकने कोणताही भीती बाळगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक यांच्यातील सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी अशा विषयांवर परस्पर सहकार्याने तोडगा काढावा, असे आवाहन पाटील यांनी केले.