विजयपूरात तापमान ४2 अंशावर, जिल्हा प्रशासनाचा हाय अलर्ट जाहीर
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
उन्हाळ्यात विजयपूर जिल्ह्यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतो. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता इतकी असते की घराबाहेर पडणे कठीण होते. यावर्षीही तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जाहीर केला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात १० खाटांचा वातानुकूलित हीट स्ट्रोक वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.
विजयपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे संभाव्य ‘हीट वेव्ह’चा सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालय पूर्णपणे सज्ज झाले आहे. नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र हीट स्ट्रोक वॉर्ड स्थापन करण्यात आला असून, या वॉर्डमध्ये थंड वातावरणासाठी एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. आजारी रुग्णांना त्वरित उपचार देण्यासाठी १० खाटांची विशेष खोल्या राखीव ठेवण्यात आले आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी द्रव पदार्थ, थंड पेये यांचे सेवन करावे. तसेच वृद्ध आणि लहान मुलांना उन्हात बाहेर पाठवू नये. अत्यावश्यक असल्यासच सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी बाहेर पडावे, अन्यथा सावलीतच काम करावे, अन्यथा हीट स्ट्रोकचा धोका संभवतो, असा इशारा देण्यात आला आहे.
उन्हाळ्यात आवश्यक काळजी घेऊन स्वतःचे आरोग्य जपावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
