कांद्याच्या दरातील घसरण: विजयपूरात शेतकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर कांदे टाकून तीव्र निषेध
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कांद्याच्या दरात तीव्र घसरण झाल्याच्या निषेधार्थ विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुप्पकडी क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शेतकऱ्यांनी कांद्याचे ढिगारे टाकून तीव्र आंदोलन केले. कुप्पकडी येथील फळबागायतदार एफपीओ (शेतकरी उत्पादक संस्था) आवारात देखील कांदे टाकण्यात आले आहेत.
उत्तम प्रतीचा कांदा क्विंटलला फक्त २०० रुपयांना विक्रीस ठेवण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
बागलकोटमध्ये त्याच कांद्याला क्विंटलला १००० रुपये दर मिळाल्याची नोंद आहे. “डीएपी खतासाठी १२०० रुपये, युरिया साठी ३०० रुपये खर्च येतो. मग आम्ही एवढ्या कष्टाने कांदा का पिकवायचा?” असा सवाल शेतकऱ्यांनी करून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.