विजयपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, विज कोसळून दोघांचा मृत्यू
विजयपूर/ प्रतिनिधी -दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील विविध भागांत मंगळवारी गडगडाटासह जोरदार पाऊस झाला असून, विजेच्या कडाक्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुद्देबिहाळ तालुक्यातील तंगडगी गावात मंगळवारी शेतात काम करत असताना शेतकरी मल्लप्पा गुरूशांतप्पा ताळिकोटी (वय 47) यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. पावसाच्या वेळी ते शेतातील चिंचाच्या झाडाखाली आसरा घेत असताना वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुद्देबिहाळ तालुक्याच्या आलूर गावात मजुरीसाठी आलेले महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मणिकनाळ गावचे श्रमिक श्रीशैल रामलिंग मुळगकोड (वय 35) यांचाही विजेच्या धक्याने मृत्यू झाला.
विजयपूर, सिंदगी, बसवण बागेवाडी, नालतवाड, देवरहिप्परगी या भागांमध्ये सुमारे एक तास गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. ताळिकोट आणि होरती या भागात मात्र तुरळक पाऊस झाला.
विजयपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एक जुने झाड वकिलांच्या कार्यालयावर कोसळले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. के.सी. मार्केट रोडवर पावसाचे पाणी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे नागरिक आणि वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण झाला.
उकाड्याने त्रस्त असलेले विजयपूरचे नागरिक या वर्षीच्या पहिल्या पावसामुळे दिलासा अनुभवत आहेत. उन्हाळ्याच्या
वातावरणाला थोडेसे गारवा लाभला. पावसाच्या जोरामुळे गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आले आणि शहरातील खालच्या भागात पाणी साचले होते
मुद्देबिहाळ तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला
मुद्देबिहाळ शहरातील व्हीबीसी हायस्कूल मैदानाच्या उतार भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्य रस्ते आणि खालच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी हा पाऊस आनंददायी ठरला.
आलमट्टी परिसरात वाऱ्यामुळे शेतातील शेड्स उडून गेले असून, 220 केव्ही वीज प्रसारणाचे टॉवर आणि खांब कोसळून नुकसान झाले आहे.